शेवग्याची उगवण तसेच शेंगा न येण्याची कारणे, त्याच्या समस्या व उपाय

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर

शेवग्याची उगवण समस्या व उपाय

सर्वसाधारणपणे काही शेतकऱ्यांच्या रोपे तयार करण्याच्य पद्धतीमध्ये असे आढळले की, हे शेतकरी कुशलतेने रोपांसाठी बियाला जर्मीनेटरची बीजप्रक्रिया करतात, मात्र मातीची चुकीची निवड व अयोग्य पाणी व्यवस्थापन यामुळे बियांच्या उगवणीवर काही प्रमाणात समस्या निर्मात होत आहे.

रोपे तयार करण्यासाठी काळी माती (चुकीची) वापरत असल्याचे आढळले आहे. या मातीत जेव्हा रोपांसाठी बी जर्मीनेटरची बीजप्रक्रिया करून पिशव्यांमध्ये लावले जाते, तसेत रोपे वाफ्यात घट्ट रचल्याने अगदी झारीने जरी पाणी दिले, तरी ही काळी माती जास्त चिकणमातीयुक्त असल्याने वरील भागावरील मातीची ढपली तयार होते. परिणामी अंकूर बाकर येण्यास वरील कडक ढपलीच अडथडा निर्माण होतो. तसेच आतपर्यंत उष्णता न मिळाल्याने आतील ओली माती तशीच कायम चिकट राहते आणि बी सडू लागते. तर काही वेळा बी पिशवीमध्ये अर्धा इंचापेक्षा अधिक खोल लावले जाते. तेव्हा रोपांसाठी झारीने पाणी (वाफ्यात रचलेल्या रोपांच्या पिशव्यांना ) दिल्याने फक्त वरील पापुद्रा ओला होतो आणि आतील बीयाजवळील माती सतत कोरडी राहिल्यामुळेही उगवणक्षमतेवर त्याचा अनिष्ठ परिणाम झाल्याचे आढळले आहे.

तेव्हा माती निवडताना ती पोयटायुक्त असावी. त्यामध्ये १० ते १५% बारीक वाळू आणि १ चमच (लहान) कल्पतरू सेंद्रिय खात मिसळून घ्यावे. म्हणजे वाळू व पोयटा मातीने पाण्याचा योग्य निचरा होईल. तर कल्पतरू खतामुळे माती घट्ट होणार नाही. पोकळी निर्माण होईल. त्यामुळे सतत वाफसा अवस्था राहील. अशा पद्धतीने मातीच मिश्रण करून ४ x ६ इंचाच्या पिशव्यांना दोन्ही बाजूला २-२ होल पाडून त्यामध्ये वरील निवडलेली माती भरावी. माती भरताना पिशवीचा वरील १ इंच भाग रिकामी ठेवावा. ही माती झारीने पूर्ण ओली करून मग त्यामध्ये जर्मीनेटर व प्रोतेक्टंटची बीजप्रक्रिया केलेले शेवग्याचे बी आडवे करून १ सेंटीमीटर खोल लावावे आणि दररोज झारीने हलकेसे पाणी द्यावे, सर्वसाधारणपणे अशा पद्धती बी ७-८ दिवसात पूर्ण उगवते. काही बियांची उगवण पुढेमागे होते असल्यास न उगवलेल्या रोपांच्या पिशव्यांवर बी तोकल्यानंतर ५ व्या दिवसापासून सप्तामृत (प्रत्येकी) १ मिली आणि २ मिली प्रति लि.पाणी या प्रमाणात दर दोन दिवसांच्या अंतराने आळवणी (ड्रेंचिंग) करावे. म्हणजे उगवणीस उशीर झालेले बियाणेदेखील उगवेल. बी उगलल्यांतर २-३ पानांवर असताना जर्मीनेटरचे ड्रेंचिंग (आळवणी ) करावे. उगवणीनंतर ६ ते ८ दिवसांच्या अंतराने २ वेळा सप्तामृताची फवारणी घ्यावी. म्हणजे बी १ महिन्यात लागवडीयोग्य होते.

शेवगा लागवडीसाठी जमिनीची निवड,
लागवडीचे अंतर व निगा


आम्ही देशभर केलेल्या हजारो प्रयोगावरून व त्यातून आलेल्या निष्कर्षावरून शेवगा लागवडीसाठी जमीन मध्यम प्रकारची, पोयट्याची माती असणारी, जमिनीत सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण बऱ्यापैकी असणारी, उत्तम निचऱ्याची अशी जमीन असावी. जमीन जर एकदम हलकी असेल तर शेवग्याची लागवड ही ६'x ६' ते ७'x ७' फुटावर करावी. तर मध्यम ते भारी जमिनीत शेवग्याची लागवड ८'x ८' ते १०'x १०' वर करावी. ज्यावेळेस शेवग्याची प्रत्यक्ष लागवड केली जाते. ती कमी -अधिक अंतरावर असते. त्यामुळे त्याचा फळधारणेवर विपरित परिणाम होतो. भारी काळ्या जमिनीत तिची जलधारणक्षमता अधिक असते. अशा जमिनीत लागवडीतील अंतर कमी झाल्यास आणि आवश्यकतेहून अधिक पाणी दिल्यास झाडाचा बुंधा लहान राहून फांद्याही बारीक जाडीच्या उंच अवास्तव वाढून फुलकळी कमी लागते. तर लागवडीतील अंतर जड झाल्यास अमर्याद फुटवयाची अवाजवी वाढ होते. फांद्या छाटणी न केल्याने उचं जातात व वांझा निघतात. तसेच जादा विशेषकरून नत्र व स्फूरद्युक्त अन्नद्रव्ये अनावश्यक फांद्या वाढीकडे खर्च होतात. त्यामुळे फळधरणेमध्ये अडचण निर्माण होते.

सर्वात महत्वाची शेवग्याची छाटणी

शेवग्याची छाटणी करण्याचे काम अत्यंत जिकीरीचे असते. शेवग्याची झाडे लागवडीनंतर १ || ते २ महिन्याची झाल्यावर २ ते २ || फुट उंचीची असताना शेंड्याची छाटणी करावी. त्यानंतर तो शेंडा पुन्हा जोम धरतोच, त्यामुळे पुन्हा काट करावा. म्हणजे ३ ते ४ फुटी वेगवेळ्या दिशेला निघतील. त्यानंतर मुख्य शेंडा आठवड्यातून २-३ वेळा न चुकता खुडावा आणि बाजूचे चौफेर फुटवे आठवड्यातून १ ते २ वेळा खुडावेत. म्हणजे अनावश्यक वाढ थांबून खोड, फांद्या जाड, झाडे डेरेदार होतील व त्यामध्ये आवश्यक अन्नसाठा तयार होईल. पुढे हा अन्नसाठा फुलकळी लागण्यास तसेच शेंगांचे पोषण करण्यास उपयुक्त ठरेल.

शेंडा कोणता छाटायचा कसे ओळखावे ?

पोपटी रंगाचा नाजुक शेंडाच दोन बोटे (अंगठा व मध्यमा ) यांनी खुडता येतो. हा शेंडा कसा ओळखावा ? हाताच्या पंजासारखे बारीक साधारण कोवळ्या १ ते २ सेंमी रुंद व ४ ते ७ सेंमी लांब बारीक पाने न उमललेली अशा अवस्थेत असतात. (संदर्भ - कव्हरवरील उजवीकडील खालील फोटो पहा.) गर्द हिरवा शेंडा जागीच वाकतो. अधिक झाडे असल्यास द्राक्ष विरळणीच्या कातर्‍याने छाटणी लवकर होते. छाटणी अर्धा सेंमी डोळ्याच्यावर क्रॉस (आडवी) करावी. तिरपी करू नये.

मोहर कसा ओळखावा ?

अशा पद्धतीने छाटणी केल्यावर ४ महिन्यानी प्रत्येक वेचक्यातून मोहोर येतो. अशा प्रत्येक बेचक्यात १-१ याप्रमाणे ४-५ दांडे दिसतात. या प्रत्येक दांड्याला ३ ते ४ उपदांडे येतात व या उपदांड्यांना ४ ते ५ तुरे असतात. या प्रत्येक तुऱ्याला ४-५ फुले लागतात. ही फुले सुरुवातीला राजगिरा नंतर मोहरी आणि १५ दिवसात हुरड्याच्या आकारची होतात. नंतर हिरव्या फुलातून उमलणाऱ्या पांढऱ्या पाकळ्या डोकावू लागतात. (संदर्भ -कव्हरवरील डावीकडील खालील फोटो पहा.) त्यानंतर या फुलांचे रूपांतर २१ ते ३० दिवसात वाध्यात (लहान सुतळीसारख्या शेंगात) होते. अशा पद्धतीने फलधारणा होते असते. त्यानंतर २ ते २|| महिन्यांनी शेंगा तोडणीला येतात.

जमिनीच्या मगदुरानुसार पाणी देण्याची

वेळ, पद्धत व प्रमाण


शेवग्याला मुळातच पाणी कमी लागते. झाडांची वाढ, फुलकळी लागण्यासाठी तसेच शेंगाचे पोषण होण्यासाठी झाडांना पाणी देण्याचे काही तंत्र आहे.

सर्वसाधारणपणे जादा उत्पादनासाठी झाडांची वाढ करून घेताना इतर भाजीपाला पिकंप्रमाणे शेवग्याला जास्त पाणी मुदाम दिले जाते. त्याचप्रमाणे फुलकळी किंवा शेंगा पोसण्याच्या अवस्थेत अजून पाण्याच्या प्रमाणात वाढ केली जाते. अलिकडे भारनियमनामुळे पुन्हा पाणी वेळेवर मिळेल कि नाही. याची खात्री नसल्याने अनियमित, प्रमाणापेक्ष जादा पाणी दिले जाते. त्यातही वातावरणाचा अंदाज (अभ्यास न करता) न घेता २४ तासाच्या कालावधीत कधीही पाणी दिले जाते. त्याचा परिणाम एकंदरीत पिकाच्या अनावश्यक वाढीवर, फुलकळी कमी, न लागण्यावर, लागलेली फुलकळी गळण्यावर, फुळधारणा न होण्यावर होत असतो.

वातावरणाचा फलधारणा व शेंगा लागण्यावर होणारा परिणाम

जेव्हा तापमान ८ डिग्री ते १२ डिग्री सेल्सिअसचे दरम्यान थंडीमध्ये असते (डिसेंबर -जानेवारी -फेब्रुवारी) तेव्हा जादा पाणी (आठवड्याला) किंवा त्याच्याही अगोदर दिले गेल्यास हवेमध्ये ओलावा. जमिनीत प्रमाणापेक्षा जास्त ओलावा. त्यामुळे फुलकळी न लागता फांद्या अस्ताव्यस्त जोमाने सरळ १० ते १५ फुटापर्यंत बेशरमी (महानंदा) सारख्या किंबहुना त्याकाळात छाटणी न केल्यास त्याहून अधिक वाढतात. तेव्हा फांद्यांची जाडी हाताच्या ते पायाच्या अंगठ्याच्या आकाराची राहते. परिणामी फुल लागतच नाही.

पाणी कधी, कसे, केव्हा द्यावे ?

शेवग्याला पाणी जर जमीन हलक्या प्रतीची असेल आणि झाडाची वाढीची अवस्था (पहिले ४ ते ५ महिन्याचा काळ) असेल तर थंडीमध्ये या अवस्थेत पाणी १२ ते १५ दिवसांनी द्यावे. तापमान जर ८ ते १६ डिग्री सेल्सीअस किंवा त्याहून खाली आले असल्यास पाण्याच्या पाळीतील अंतर १५ दिवसांचे ठेवावे. तापमान कमी असताना पाणी दिवसा सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत द्यावे. फुलकळी अवस्थेत वरील परिस्थितीत पी ८ ते १२ दिवसांच्या अंतराने द्यावे.

जमीन जर मध्यम ते भारी काळी असेल, तेव्हा पाणी १० ते १२ दिवसांनी देणे योग्य. उन्हाळ्यामध्ये जेव्हा तापमान ३५ ते ४२ डिग्री से. असते. तेव्हा पाणी हलक्या जमिनीत ५ ते ६ तर भारी जमिनीत ८ ते १० दिवसांच्या अंतराने सकाळी १० वाजण्यापूर्वी किंवा संध्याकाळी ६ नंतर द्यावे. उन्हाळ्यामध्ये तापमान अधिक असताना अन्हाचे पाणी देऊ नये. त्यामुळे फुलगळ होण्याची शक्यता असते, नव्हे होतेच. पाणी देताना झाडे वंरब्यावर घेऊन त्याच्या बाजूने सर्‍या पाडून त्यामधून द्यावे. जोड आळे करून बाहेरील आळ्यात पाणी दिले तरी चालते. शेंगा लागण्यासाठी १८ ते ३२ डिग्री से. तापमान अनुकूल असते.

शेवग्यास शक्यतो ठिबक करू नये. कारण ठिबकचे पाणी हे झाडाच्या मुळाजवळ पडत असल्याने पांढरी मुळी सुस्त होते. तिला आपोआप पाणी मिळत असल्याने तिची क्रयशक्ती कमी होऊन ती पाण्याचा शोध घेत नाही. त्यामुळे मुळ्या वरच्याच भागात मर्यादित वाढतात. अशा वेळी झाडांची अवस्था बंदीस्त कोंबड्यासारखी होते. त्यांना जसे खाद्य, पाणी जागेवर मिळाल्याने त्याची क्रयशक्ती कमी होऊन सुस्त होतात. ती अवस्था शेवग्याच्या पांढर्‍या मुळ्यांची झाल्याने झाडाची वाढ अधिक पाण्याने अनियमित, अस्ताव्यस्त होते. मुळ्यांची वाढ होते नाही.

'शिद्धीविनायक' शेवगा कल्पवृक्ष

आम्ही सांगितल्याप्रमाणे शेवग्याला बाराही महिने बाजारभाव इतर शेतीमालापेक्षा जादा आणि खात्रीशीर मिळत आहे, हे गेल्या २५ वर्षाच्या सखोल मार्केटिंगच्या अभ्यासावरून लक्षात आले व देशभर शेतकर्‍यांना या पिकाने अधिक भाव मिळवून दिला आहे. म्हणून जड पैशाच्या हव्यासापोटी शेवग्याची लागवड ४ ते ५ एकर क्षेत्रावर करावयाची असल्यास छाटणीसाठी १० मजुर सहा महिने शेंडा खुडणीसाठी लागतात. शेतकरी माल अधिक निघाला म्हणजे एकाच गावी एकाच दलालाकडे पाठवितात तेव्हा भाव कमी मिळतो. याकरिता अग्रोवन अथवा पणन मंडळाद्वारे एसएमएस सेवेद्वारे दोन-तीन दिवसांच्या मार्केटची माहिती घ्यावी व वर्षातील बाराही महिन्याचे शेबग्याचे व्यवस्थापन आमचे कृषी विज्ञान केंद्रातील तज्ञांच्या सल्ल्याने करावे. आणि दोन ते तीन ठिकाणी माल पाठवून पहावे. 'सिद्धीविनायक ' शेवगा हे तिसर्‍या जगातील गरीब राष्ट्रांसाठी कल्पवृक्ष म्हणून आम्ही याचा शोध व वेध घेत आहोत, सार्‍या जगाचे आरोग्य बिना औषधाने तंदुरस्त रहावे म्हणून प्रयत्नशील आहोत. तरी या लेखाचा आपण योग्य बोध घ्यावा हीच अपेक्षा.

New Articles
more...